• Mon. Jan 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

“राष्ट्रवादीच्या फुटीपूर्वीच भाजपशी चर्चा केली होती” – अजित पवार गटाची पहिली मोठी कबुली

ByEditor

Jul 19, 2025

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षविलीन प्रक्रियेबाबत भाजपशी पूर्वीच चर्चा झाल्याची कबुली दिली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीतील फूट आणि भविष्यातील एकत्रीकरणाबाबत स्पष्ट भूमिका मांडली.

भाजपशी आधीच चर्चा

“आम्ही जेव्हा वेगळा निर्णय घेत भाजपसोबत गेलो, तेव्हा त्यांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत सखोल चर्चा केली होती,” असे सांगत तटकरे यांनी राजकीय गोंधळावर स्पष्ट उत्तर दिले. तसेच जर भविष्यात शरद पवार गटाशी एकत्रीकरणाबाबत चर्चा झाली, तरी ती भाजपच्या नेत्यांशी समन्वय करूनच केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या एकत्रीकरणाची कोणतीही चर्चा नाही “दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या एकत्रीकरणाबाबत सध्या कुठेही कोणतीही चर्चा सुरू नाही,” असे सांगून त्यांनी एनडीएतील सहभाग अधोरेखित केला. “आम्ही एनडीएमध्येच राहणार असून त्या निर्णयामागे ठाम आहोत,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया तटकरे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला असला, तरी ‘लाडकी बहिण योजना’ आणि इतर विकास योजनांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास मिळवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. त्यातून विधानसभेत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. निवडणूक आयोगानेही आमचाच पक्ष अधिकृत मान्य केला.”

या वक्तव्यातून अजित पवार गटाचा भाजपसोबतचा संपूर्ण राजकीय समन्वय अधोरेखित होत असून, पक्षविलीन किंवा पुनःएकत्रीकरणाच्या चर्चांवर कोणतीही कृती झाली तरी ती भाजपच्या सहमतीनेच असेल, हे या कबुलीमधून स्पष्ट होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!