शिमला: हिमाचल प्रदेशात पावसाने परत एकदा हाहाकार माजवला आहे. मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून विविध ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. शिमलामधील समर हिल येथे असलेले शिव मंदिर भूस्खलनात दबल्या गेले आहे. यात अनेक लोक मातीच्या मलब्याखाली दबल्या गेले असल्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. आतापर्यंत 3 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
30 लोक दबल्याची शक्यता
शिमलाच्या समरहिल भागात असलेले शिव बारी मंदिर भूस्खलनात गाडल्या गेले आहे. मंदिराच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 30 लोक दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान भूस्खलनाची घटना घडल्याची माहिती मिळताच स्थानिक पातळीवरील रेस्क्यू दलाने बचाव कार्य सुरू केले आहे. सहायक पोलीस अधीक्षक सुनील नेगी यांनी सांगितले की, बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 15 जणांना वाचवण्यात आले आहे. सर्वांना उपचारासाठी आयजीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवार असल्याने शिव मंदिरात भाविकांची गर्दी होती. हिमाचल प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यात भूस्खलन आणि अचानक पुराच्या घटना घडत आहेत. हवामान खात्याने हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.