मिलिंद माने
मुंबई : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यावरून उपोषणाला बसलेल्या मराठा समाजातील लोकांवर झालेल्या पोलिसी लाठीमारानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून गोवारी हत्याकांडात मधुकर पिचड यांचा मंत्रिपदावरून बळी दिला होता आता त्याची पुनरावृत्ती जालन्यातील प्रकरणावरून शिंदे की फडणवीस या दोघांपैकी कुणाचा राजकीय बळी दिला जाणार? अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चिले जाऊ लागली आहे.
अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होते. उपोषणादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलीस घेऊन जात होते त्यावेळी आंदोलकांनी पोलिसांशी हुज्जत घालून जरांगे पाटील यांना रुग्णालयात घेऊन जाण्यास प्रतिकार करून पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलीस जखमी झाले त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ला केल्याने यात आंदोलक जखमी झाले असून अनेकांना रुग्णालयात दाखल केल गेले आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू होते मात्र उपोषणकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला त्याचे रूपांतर झटापटीत झाले. त्यानंतर तिथे दगडफेक झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी लाठीमार केला व ते कमी म्हणून की काय हवेत गोळीबार केला याप्रकरणी 16 आरोपींसह तीनशे ते साडेतीनशे आदिनाथ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
जालन्यातील या घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत यांच्या फिर्यादीवरून ऋषिकेश बेंद्रे, श्रीराम कुरणकर, संभाजी बेंद्रे, महारुद्र अंबरुळे, राजेंद्र कुटुंबे, भागवत तारक, दादा घाडगे, पांडुरंग तारक, अमोल पंडित, किरण तारक, अमोल लहाने, वैभव आवटे, किशोर कटारे, अविनाश मांगदरे, मयूर आवटे यांच्यासह तीनशे ते साडेतीनशे आंदोलकांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 307, 333 ,332, 353, 427, 435,120(. ब),143,147,148,149, मुंबई पोलीस कायद्याचे कलम 135 आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम तीन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे करीत आहेत.
जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या गावातील मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांवर झालेल्या लाठीहल्ला प्रकरणानंतर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार, भाजपाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार छत्रपती संभाजी राजे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सर्व या ठिकाणी भेटी देत आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड प्रमाणात तापत असताना दुसरीकडे राज्यात मराठा समाजातील उपोषणकर्त्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातील सगळ्या जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झाला असून गाव पातळीपासून शहर पातळीपर्यंत सर्वत्र बैठकांचे आयोजन करून पुढील निर्णयापर्यंत मराठा समाज येऊन ठेपला आहे. तर राज्यातील अनेक भागात जाळपोळ चालू आहे. मात्र राज्यातील मंत्रिमंडळातील एकही मंत्री सद्यस्थितीत जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात जाण्यास तयार नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत असल्याने मराठा समाज मोठ्या प्रमाणावर संतप्त झाला आहे.
मराठा समाजातील उपोषणकर्त्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यामुळे राज्यातील सर्वात पक्षातील नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना या प्रकरणावरून मात्र राज्यातील कोणत्या नेत्याचा राजकीय बळी जाणार याची देखील चर्चा राज्य सरकारमधील मंत्री, विरोधी पक्षातील नेत्यांपासून सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चिली जाऊ लागली आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलने केली त्या आंदोलनाचा इतिहास बघितला तर आंदोलकांनी कोणतं चुकीचं पाऊल टाकलेले नसेल. यामुळे येथे सरकारच चुकलं असं म्हणत राज ठाकरेंनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. पण ते ज्या कारणाने घडलं त्या गेल्या वीस वर्षात महाराष्ट्राचे विस्कटलेलं राजकारण जबाबदार असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, जालन्यातील घटना अतिशय दुर्दैवी असून या घटनेचा निषेध मी नोंदवीत आहे मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलन केली त्या आंदोलनाचा इतिहास बघितला तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं किती आंदोलने, मोर्चा यांचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि सामंजसपणाने आधीची आंदोलने झाली होती. ही पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? याची माहिती पोलिसांच्या अहवालात येईल पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व इतिहास बघता आंदोलकांनी कोणतं चुकीचं पाऊल टाकलं नसेल यामुळे येथे सरकारच चुकलं हे निश्चित होतं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, जालन्याच्या आंदोलनानंतर प्रशासन आणि सध्याची राजकीय परिस्थिती याला जबाबदार आहे. जालन्यात काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणाने घडलं त्याला गेल्या वीस वर्षात महाराष्ट्राचे विस्कटलेलं राजकारण जबाबदार असल्याचे देखील राज ठाकरे म्हणाले. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती ती आता मिटली असेल असं आम्ही मानतो त्यामुळे आता दोषारोप नको तर कृती अपेक्षित आहे असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये मराठा समाजाला कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आव्हान केले आहे. राज ठाकरे म्हणाले की, माझी मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे या घटनेचे पडसाद इतरत्र उमटू देऊ नका. तुम्ही आंदोलन आणि मोर्चाचा आदर्श घालून दिला आहेत तो खरच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठा माणसाची आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि यापुढे पण उभी राहील.
जालना जिल्ह्यातील अंबडमधील अंतरवाली सराटी येथे चार दिवसापासून आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर शुक्रवारी जोरदार लाठीहल्ला झाला. यामुळे राज्यात संतप्त वातावरण निर्माण झाले असून याचे ठीकठिकाणी पडसाद उमटू लागले आहेत. ही घटना निंदनीय असून याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावेळी केला. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने शब्द पाळला नसल्याने पुन्हा आंदोलन करण्याची वेळ मराठा समाजावर आल्याचे म्हणत पवार यांनी पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या ठिकाणी भेट दिली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर मराठा समाजावर झालेला अमानुष लाठीचार्ज पाहून आलो आहे यात ८० ते ९० आंदोलक जखमी झाले आहेत. या आंदोलनाशी काही संबंध नसणाऱ्यांनाही पोलिसांच्या लाठीहल्ल्याचा मार खावा लागला. यानंतर अज्ञात 350 ते 400 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. येथे कारण नसतानाही पोलिसांचा मोठा फौजफाटा आणला गेला यातून पुढे शांततेच्या मार्गाने संघर्ष करू असा इशारा पवारांनी दिला.
सरकारने फक्त आश्वासन दिली पण त्याची पूर्तता केली नसल्याचा आरोप पवारांनी केला. ते म्हणाले यापूर्वी मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने आंदोलने केली मात्र असे प्रकार घडले नाहीत. मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, शब्द पाळला नसल्यानेच आंदोलन करण्यात आले. एका बाजूला चर्चा सुरू ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला लाठीहल्ला करायचा. आंदोलन दाबण्यासाठी सरकारने दबाव आणण्याचा प्रयत्न केला असा घणाघात देखील पवारांनी केला.
जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यामुळे एकच खळबळ उडाल्यानंतर या घटनेवर प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आपण मराठा आंदोलकांसोबत आहोत. लाठीचार्ज करणारे पोलीस दोशी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे. तसेच त्यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे. अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मराठा कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी रास्त व न्यायाची आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावर आणि न्यायालयातही तितक्यात ताकतीने लढण्याची आपली सगळ्यांची भूमिका आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आणि सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. यावरच आंदोलनाचे यश अवलंबून आहे असं अजित पवार म्हणाले. जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा विश्वास मी राज्यातील नागरिकांना देत असल्याचे अजित पवार म्हणाले.
राज्यातील मराठा आंदोलनान लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श आणि गौरवशाली परंपरा कायम ठेवून कायदा सुव्यवस्था कायम राखत लोकशाही मार्गानेच हे आंदोलन पुढे जाईल याची काळजी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल असेही अजित पवार म्हणाले.
राज्य शासन आणि महाराष्ट्रातील प्रत्येकजण मराठा आंदोलकांच्या सोबत आहे असा विश्वास मी देतो. अंबड येथील घटनेतील दिवशी पोलीसवांवर निश्चित कारवाई करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातली जाणार नाही राज्यात परिस्थिती विघटना नाही शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी सर्वांनी घ्यावी असे आवाहन मराठा आंदोलन आणि राज्यातील नागरिकांना आहे असे अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
जालन्यातील घटनेनंतर सोलापूर औरंगाबाद महामार्गावर महाकाळा वडीगोद्री शहागडमध्ये एसटी पेटवण्यात आली. त्याचबरोबर पोलिसांची गाडी देखील पेटवली. 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासोबत दहाजण आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणाचे आंदोलन चिघळू नये यासाठी काल पोलिसांकडून उपोषणकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर वरील सर्व प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
जालन्यात मराठा समाज बांधवांवर लाटी हल्ला करणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी तातडीने करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. उदयनराजे यांनी उपोषणकर्त्यांची आणि लाठीहल्ल्यात जखमी झालेल्यांची भेट घेतली. या भेटीनंतर उदयनराजे माध्यमांशी बोलत होते.
खासदार उदयनराजे भोसले यावेळी बोलताना म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या समाज बांधवांवर चालण्यात जो हल्ला झाला त्याचा मी जाहीर निषेध करतो. शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांवर लाठीहल्ला केला. त्या सर्व अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे जे लोक पोलिसांच्या लाठीहल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या उपचाराची सर्व जबाबदारी सरकारने घ्यावी तसेच जालन्यातील जो लाठीहल्ला झाला आहे त्याची तातडीने न्यायालयीन चौकशी करण्यात यावी.
राज्यातील प्रत्येक मराठा व्यक्तीच्या मनात हीच इच्छा आहे की, इतर जाती-जमातीतील लोकांना न्याय मिळत असेल तर मग मराठा समाजाला न्याय का नाही. खरंतर हे फार पूर्वीपासून व्हायला पाहिजे होते पण का झाले नाही हे मला माहीत नाही ज्यावेळी कुठल्याही समाजावर अन्याय होतो तेव्हा उद्रेक होणे स्वाभाविक आहे असे उदयनराजे यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना खासदार उदयनराजे यांनी सांगितले की, आरक्षणासंदर्भातले आपले आंदोलन हे शांततेच्या मार्गाने चालू ठेवावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याशी माझी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा झाली. येत्या दोन-तीन दिवसात तुमच्या मागण्या त्यांच्या कानावर मी घालेल तसेच आंदोलनकर्त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची व उपमुख्यमंत्री यांची भेट घालून दिली जाईल असे उदयनराजे यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेतल्यानंतर माध्यमांसमोर बोलताना सांगितले.
जालना जिल्ह्यातील घटनेनंतर राज्यातील सर्व जिल्ह्यात मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाला असून येत्या दोन-चार दिवसात राज्यात मोठ्या प्रमाणावर मराठा समाज आक्रमक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील राजकीय घडामोडींबरोबरच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राजकीय दुश्मनी काढण्यासाठी राज्यातील राजकारण कोणत्या थराला जाते ते येत्या काही अवधितच समजेल मात्र या आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर यामध्ये बळी कोणाचा देणार शिंदेंचा की फडणवीसांचा हे येत्या दोन-चार दिवसातच याबाबत मोठ्या घडामोडी राज्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.