• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

खाजगी सर्वेक्षणात शिंदे गटातील बंडखोर आमदारांना जनतेने नाकारले?

ByEditor

Oct 20, 2023

शिंदे गटातील आमदार चिंतेच्या छायेत!

मिलिंद माने
मुंबई :
राज्यात लोकसभा निवडणुकीबरोबरच राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर मतदार संघातील जनता कोणाच्या बरोबर असेल याची चिंता शिंदे गटातील आमदारांना लागली असल्याने शिंदे गटातील बहुतांशी आमदारांकडून मतदारसंघात खाजगी संस्थांकडून केलेल्या सर्वेक्षणात या बंडखोर आमदारांना पुन्हा जनतेने कौल नाकारल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये कमालीचे नैराश्याचे वातावरण आले असून या चिंतेने शिंदे गटातील आमदारांना ग्रासले आहे.

शिवसेना पक्षातून बंडखोरी करून त्याच मतदार संघातून पुन्हा निवडून येणे फक्त नारायण राणे यांच्याबरोबर गेलेल्या मुंबईतील नायगाव विधानसभा मतदारसंघातील कालिदास कोळंबकर यांना जमले आहे. त्यानंतर यापूर्वी शिवसेनेत असलेले छगन भुजबळ व नारायण राणे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांची काय गत झाली तीच वेळ आता आपल्यावर येऊन ठेपली आहे. सत्ता, संपत्ती व पैशाच्या जोरावर केलेल्या विकासकामांचे पैसे अडकल्याने अनेक मूळ शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटातील आमदारांबरोबर आहेत. मात्र, निवडणुका लागल्यानंतर हेच पदाधिकारी आपल्याबरोबर राहतील की नाही याची शाश्वती शिंदे गटातील आमदारांना नसल्याने अनेक शिंदे गटातील आमदार चिंताग्रस्त झाले आहेत.

शिवसेना पक्षातून बंडखोरी केल्यानंतर जवळपास दीड वर्षाहून अधिक कालावधी उलटला मात्र, अजूनही शिंदे गटातील आमदारांबरोबर असणारे शिवसेनेचे पदाधिकारी यांची नाळ अद्याप भाजपा व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर जुळत नसल्याने शिवसेनेचे अनेक मूळ पदाधिकारी शरीराने शिंदे गटाबरोबर तर मनाने शिवसेनेबरोबर असल्याचे अनेक पदाधिकारी खाजगीत सांगत आहेत. शिवसेना पक्षातून बंडखोरी केल्यानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेची निवडणूक लागली तर आपल्या मतदारसंघात काय परिस्थिती असेल याची चिंता शिवसेना पक्षाच्या चिन्हावर आजपर्यंत तीन वेळा निवडणूक लढलेल्या या शिंदे गटातील आमदारांना लागली आहे. त्यामुळे सत्तेच्या जोरावरती व पैशाच्या ताकदीवरती अनेक शिंदे गटातील आमदारांनी खाजगी संस्थेमार्फत आत्तापर्यंत तीन वेळा मतदार संघात सर्वेक्षण केले असून या तिन्ही वेळा केलेल्या सर्वेक्षणात मतदारांनी स्पष्टपणे शिंदे गटातील आमदारांना नाकारल्याचा अहवाल या खाजगी सर्वेक्षण यंत्रणेंनी दिल्याने शिंदे गटातील अनेक आमदार चिंताग्रस्त झाले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंडखोरी करून त्यांच्या समवेत गेलेले बहुतांश आमदार हे शिवसेनेच्या तिकिटावर तीन वेळा निवडून आलेले आहेत. यापूर्वी मतदारसंघातील स्थिती शिवसेना पक्षाच्या आदेशावर शिवसैनिक निवडणुकीसाठी एकवटून काम करीत होता. मात्र, आता ती परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे की काय या शिंदे गटातील आमदारांनी खाजगी सर्वेक्षण यंत्रणेमार्फत आपल्या मतदारसंघात सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणा दरम्यान विद्यमान आमदारांना मतदारांनी नाकारले परंतु, आपल्या ऐवजी आपली पत्नी अथवा आपला मुलगा याला निवडणुकीत उमेदवारी मिळाली तर निवडून येईल का याची देखील चाचणी या खाजगी संस्थेने सर्वेक्षणात केली मात्र सर्वत्र गद्दार म्हणून या आमदारांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना आम्ही मतदान करणार नाही, गद्दारांना शिवसेनेत थरा नाही, अथवा बाळासाहेबांचा कडवट व निष्ठावंत शिवसैनिक या गद्दार आमदार व त्यांच्या नातेवाईकांच्या बरोबर जाणार नाही असा सर्वेक्षणातून आलेला अहवाल असल्याने शिंदे गटातील आमदारांना मोठ्या चिंतेने ग्रासले आहे. यामुळे अनेक आमदार चिंताग्रस्त झाले असून लोकसभा निवडणुकी बरोबर जर राज्य विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक लागली तर आपले काही खरे नाही या चिंतेने अनेक आमदार कमालीचे भयभीत झाले असून केवळ उसने अवसान आणून मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली असून आपण पुन्हा निवडून येऊ असे चेहऱ्यावरती उसने हसू आणून मतदारांसमोर सद्यस्थितीत जात आहेत मात्र मतदार संघातील मतदार मात्र यांच्या भूलथापांना आता बळी पडणार नसल्याचे खाजगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये स्पष्ट केले आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील अनेक बंडखोर आमदार धास्तावले आहेत.

खाजगी सर्वेक्षण केलेल्या मतदार संघातील आमदारांची नावे पुढीलप्रमाणे;
(1) श्री निवास वनगा (पालघर)
(2) महेश शिंदे (कोरेगाव)
(3) संदिपान भुमरे (पैठण)
(4) अनिल बाबर (खानापूर)
(5) शहाजी बापू पाटील (सांगोला)
(6) किशोर आप्पा पाटील (पाचोरा)
(7) चिमणराव आबा पाटील (एरंडोल)
(8) महेंद्र दळवी (अलिबाग)
(9) प्रदीप जयस्वाल (औरंगाबाद )
(10) शंभूराज देसाई (पाटण)
(11) ज्ञानराज चौगुले (उमरगा)
(12) बालाजी किनिकर (अंबरनाथ)
(13) भरत गोगावले (महाड )
(14) संजय गायकवाड (बुलढाणा)
(15) सुहास कांदे( नांदगाव)
(16) प्रकाश आबिटकर (राधानगरी)
(17) प्रकाश सुर्वे (माग ठाणे)
(18) सदा सरवणकर (माहीम)
(19) मंगेश कुडाळकर (कुर्ला )
(20) यामिनी जाधव (भायखळा)
(21) दिलीप लांडे (चांदीवली)
(22) गुलाबराव पाटील (जळगाव)
(23) दीपक केसरकर (सावंतवाडी)
(24) अब्दुल सत्तार (सिल्लोड)
(25) महेंद्र थोरवे (कर्जत)
(26) बालाजी कल्याणकर (नांदेड)
(27) लता सोनवणे (चोपडा)
(28) तानाजी सावंत (भूम परांडा)
(29) योगेश कदम (दापोली)
(30) संजय शिरसाठ (औरंगाबाद)
(31) संजय राठोड (यवतमाळ)
(32) संतोष बांगर (कळमनुरी)
(33) उदय सामंत (रत्नागिरी)

शिंदे गटातील आमदारांना वाटाण्याच्या अक्षता?

राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंडखोरी करून गेलेल्या शिवसेना पक्षातील आमदारांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्री, राज्यमंत्री, महामंडळ तसेच राज्य विधान मंडळाच्या समित्यांवर तसेच मतदार संघातील 15 ते 20 वर्षे रखडलेली कामे व जलसंपदा विभागाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचे वचन शिवसेना पक्षातून फुटून गेल्यानंतर या आमदारांना देण्यात आले होते. मात्र, ठराविक आमदारांना मंत्रिमंडळात समावेशानंतर बाकीच्यांच्या वाट्याला काहीच आलेले नाही तसेच येणाऱ्या निवडणुकीत मतदार संघात पुन्हा तिकीट देऊन निवडून आणण्याचे वचन देखील देण्यात आले होते मात्र शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित दादा पवार यांचा समावेश झाल्याने शिंदे गटातील शिवसेना आमदार बिथरले आहेत त्यातच लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर आपले राजकीय करिगर भविष्यात अंधारात असल्याचे या आमदारांच्या मतदार संघात झालेल्या सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाल्याने शिवसेना रंग मातेला गेले शिंदे गटातील आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता झाली असून परतीच्या मार्गावर असून लवकरच शिंदे गटाला खिंडार पडणार असल्याचे समजते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!