• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

संजीवन समाधी सोहळ्यावर आळंदी बंदचं सावट, देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलल्याने ग्रामस्थ आक्रमक

ByEditor

Dec 5, 2023

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र संजीवन समाधी सोहळ्यावर आळंदी बंदचं सावट आहे.

देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलण्यात आल्यानं ग्रामस्थांनी आज आळंदी बंदची हाक दिली आहे. या बंदमुळे लाखो वारकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. आळंदी देवस्थानच्या तीन विश्वस्तांची निवड नुकतीच करण्यात आली. यात योगी निरंजननाथ, ऍड. राजेंद्र उमाप आणि डॉ भावार्थ देखणेंचा समावेश आहे. मात्र स्थानिकांना पुन्हा एकदा डावलण्यात आलं. म्हणूनच आळंदीकर आक्रमक झालेत. सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे.

संजीवन समाधी सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी बंद पुकारून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. संत नामदेव, संत पांडुरंग आणि संत कुंडलिक यांची पालखी लाखो वारकऱ्यांसह अलंकापुरीत दाखल होतात. अशावेळी आळंदी बंद ठेवली जाणार असल्यानं, वारकऱ्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थानने आळंदीनगरी बंद ठेऊ नये, असं आवाहन ही केलेलं आहे. मात्र आंदोलक आपल्या भूमीकेवर ठाम असून वारकऱ्यांना कोणताही ही त्रास होणार नाही, याची खबरदारी आंदोलक घेणार आहेत.

संजीवन समाधी सोहळ्यासाठी विठुरायाची पालखी आळंदीत दाखल

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी विठुरायाची पालखी पंढरपुरातून आळंदीत दाखल झाली आहे. 700 वर्षापूर्वी भक्ताला दिलेला शब्द आजही पाळला जात आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने 2014 पासून विठ्ठलाच्या पादुका आळंदीकडे पायी वारी करत नेल्या जातात. दरवर्षी विठ्ठलाच्या पादुका तसेच संत नामदेवराय आणि संत पुंडलिकांच्या पादुका कार्तिक शुद्ध एकादशी झाल्यानंतर पौर्णिमेला पंढरपुरातून पायी प्रस्थान करतात.रोज 35 ते 40 किलोमिटर अंतर कापत सोहळा अष्टमी दिवशी आळंदी येथे पोचणार आहे. 700 वर्षांपूर्वी विठ्ठलाने आपला लाडका भक्त ज्ञानेश्वर माऊलींना यापुढे दरवर्षी संजीवन समाधी सोहळ्याला आळंदीस येईल असा शब्द दिला होता . आज देवाच्या पादुकांसह हजारो भाविकांनी आळंदीकडे प्रस्थान ठेवले

आळंदीत हरिनामाचा अखंड गजर

कार्तिक महिन्याती आळंदी यात्रेचे महत्त्व पंढरपूर येथील कार्तिकी यात्रा तीन दिवसांची असते, तर आळंदी येथील यात्रेचा कालावधी आठ दिवसांचा असतो. त्यामुळे येथे भाविकांचा प्रचंड ओघ असतो. भाविकांच्या भक्ती भावामध्ये ही यात्रा साजरी होते.त्यामुळे सर्व वारकरी माऊलींच्या भक्तीत तल्लीन होणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक आळंदीत दाखल झालेत. पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून भाविकांनी माऊलीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांनी आळंदीत ग्रंथ, गळ्यातील तुळशीची माळ खरेदी करण्यावर भर दिला. राहुट्यांमध्ये भाविकांनी हरिनामाचा अखंड गजर सुरु आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!