ब्रिस्बेन : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारताचा प्रमुख ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतानं बरोबरी साधल्यानंतर ३८ वर्षीय अश्विननं ही घोषणा केली. अश्विनच्या नावावर एकूण ५३७ कसोटी बळी आहेत.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात पाचव्या दिवशी पावसामुळं व्यत्यय आला असतानाच्या वेळेत विराट कोहली भावूक होऊन अश्विनला मिठी मारताना कॅमेऱ्यात टिपला गेला होता. तेव्हाच नक्कीच काहीतरी घडत असावं अशी पाल क्रिकेटप्रेमींच्या मनात चुकचुकली. त्यानंतर अश्विन ऑस्ट्रेलियाचा कर्णधार नॅथन लायनसोबत वेळ घालवताना दिसला. अश्विननं अखेर ती शंका खरी ठरवली. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी अश्विनच्या निवृत्तीला दुजोरा दिला.
सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये अश्विन फक्त एक कसोटी खेळला होता. अॅडलेड इथं झालेल्या दुसऱ्या कसोटीसाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं होतं. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दहा गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात अश्विननं केवळ एक विकेट घेत २२ धावा दिल्या आणि ७ धावांची खेळी केली. अश्विन हा देशातील आजवरच्या महान ऑफ स्पिनर्सपैकी एक आहे. त्यानं भारताकडून १०६ कसोटी, ११६ वनडे आणि ६५ टी-२० सामने खेळले असून सर्व प्रकारात मिळून ७७५ विकेट्स घेतल्या आहेत.
सर्वाधिक कसोटी बळी घेणारा जगातील सातवा गोलंदाज
कसोटीत अश्विननं २४ च्या सरासरीनं आणि ५०.७ च्या स्ट्राईक रेटनं विकेट्स घेतल्या आहेत. तसंच, त्याच्या नावावर ५३७ विकेट्स आहेत. अश्विनच्या कामगिरीची यादी एवढ्यावरच संपत नाही. कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा तो जगातील सातवा गोलंदाज आहे आणि सध्या तो कसोटीत ऑफ स्पिनर्समध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. मात्र, नॅथन लायन लवकरच त्याचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
अश्विननं २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. मात्र, त्याआधीच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी त्याला वनडे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं होतं. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून एमएस धोनीसोबत खेळताना अश्विन प्रकाशझोतात आला. धोनीनं त्याला हेरलं आणि त्याच्यातील फिरकीच्या कौशल्याला वाव दिला. पॉवरप्लेमध्ये त्याच्याकडं नवीन चेंडू सोपवण्याचा जुगारही धोनी खेळला. मात्र अश्विननं त्याचा विश्वास सार्थ ठरवला.